(चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी,कलिवडे, किटवडे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी)
चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी, कलिवडे, किटवडे गावामध्ये २५ मार्च रोजी वादळवाऱ्यास पाऊस झाल्यामुळे काजू, आंबा, फणस, चिकू, नारळ आदी फळझाडांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.जंगमहट्टी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन घोंघावणाऱ्या वादळात भली मोठी काजू आंबा झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही झाडे मधून मोडून पडली आहेत. त्यामुळे काजू झाडे मालकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी काजू व फळझाडे सातबरा उताऱ्यावर नोंद केलेली नाहीत. त्यामुळे पंचनामे करून सुध्दा शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही, असे कृषि व महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे काजू झाडे मालक हवालदिल झाले आहेत.
काजू व फळझाडे नोंद नसली तरीही विशेष अध्यादेश काढून काजू झाडांची अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून एका काजू झाडाला एक लाख रूपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी विजयभाई पाटील, शाहू गावडे, राजाराम देसाई, खिरू पाटील, धोंडोपंत पाटील, एकनाथ पाटील, सतीस सबनीस, असिस कुटीनो, विठ्ठल गोंधळी आदींनी नायब तहसीलदार विलास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवून देऊ, असे आश्वासन दिले.
Post a Comment
0 Comments