कराड/प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक ९ व १० मे २५ रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन, टॉऊन हॉल या ठिकाणी अत्यंत प्रेरणादायी आणि साहित्यिक उर्जेने भरलेल्या वातावरणात पार पडले. या संमेलनात बेळगावचे प्रथितयश सीमाकवी रवींद्र पाटील यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
हा सन्मान लोकशाही न्यूज चॅनलचे संपादक विशाल पाटील यांच्याहस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष व निमंत्रक डॉ. शरद गोरे,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, संयोजक विकास भोसले,प्रा. नितीन नाळे, राजश्री बोहरा, अमोल कुंभार , हणमंत चिकणे यांची उपस्थिती होती.
सीमा भागातील मराठी अस्मिता आणि साहित्यिक योगदानाचे कौतुक
बेळगाव सीमाभागात गेल्या सहा वर्षांपासून या परिषदेच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य संमेलने यशस्वीरीत्या होत असून, कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही साहित्यिक चळवळ अधिक व्यापक होत आहे. मराठी भाषेचा जागर, अस्मितेचा बुलंद आवाज आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न या संमेलनांमधून सातत्याने होत आहे.
या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांचाही शाल, सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “सीमाभागातील मराठी जनतेवर होणारे अन्याय हे सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. महाराष्ट्र सरकारने केवळ आश्वासनांवर न थांबता निर्णायक भूमिका घ्यावी. साहित्यिकांनी या प्रश्नावर एकजुटीने चळवळ उभी करावी ही काळाची गरज आहे.”
यावेळी बेळगाव परिषदचे कार्यकारणी सदस्य मोहन अष्टेकर,मोहन पाटील,रोशनी हुंद्रे,डॉ. संजीवनी खंडागळे,प्रा. मनीषा नाडगौडा यांचा समावेश होता.सीमाकवी रवींद्र पाटील यांनी ' मी मराठी सीमापालिकडेचा ' सीमाभागातील वास्तव आणि मराठी जनतेचे दुःख आपल्या काव्यातून प्रभावीपणे मांडले.रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सीमाकवी रवींद्र पाटील यांचा हा विशेष सन्मान, संपूर्ण मराठी सीमाभागासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
यावेळी बेळगाव येथील निमंत्रीत कवी अखिल भारतीय कराड साहित्य संमेलन सहभागी बेळगाव कवी किरण पाटील ,रोशनी हुंद्रे , डॉ.संजीवनी खंडागळे, प्रा.मनिषा नाडगौडा,अशोक सुतार,व्यं.कृ.पाटील ,अस्मिता आळतेकर,शुभदा प्रभू खानोलकर,पुजा सुतार, अक्षता यळळूरकर व सुवर्णा पाटील नवोदित कवींनी काव्य सादरीकरण केले.हे संमेलन केवळ नवोदितांना व्यासपीठ देणारे नव्हे, तर सीमाभागातील साहित्यिक चळवळीला बळ देणारे ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.
Post a Comment
0 Comments