मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्राला लोककलांची समृद्ध परंपरा लाभली असून आजही ग्रामीण भागात त्या जतन केल्या जातात. अशाच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोकणात आजही वाडीवस्तीवर विविध लोककला जोपासण्याचे कार्य येथील गाव मंडळे, कलापथके करत आहेत.प्रामुख्याने नमन आणि कलगी तुरा ह्या लोककला आज जनप्रबोधनासह मनोरंजनाचे मुख्य केंद्रबिंदू बनल्या आहेत. मुंबईतील नाट्यगृहात नमन आणि कलगी तुरा ह्या लोककला पाहण्यासाठी रसिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि निश्चितच कोकणचा कणही वाया जात नाही याची प्रचिती येते. आज मोठ्या प्रमाणावर ह्या लोककलांचे संवर्धन होताना पाहायला मिळते. यात लोककला आणि लोककलावंतांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आयोजक हा महत्त्वपूर्ण कणा आहे.असंच आयोजनामध्ये अव्वल स्थानी असलेल्या श्री.पाणबुडी देवी कलामंच,मुंबई संस्थेकडून समाजरत्न सोहळा मंगळवार दि. 15 जुलै 25 रोजी रात्रौ 8.30 वाजता, मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले-मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.यासोबत नवी वैचारिक शिकवणींची पर्वणी, समाज प्रबोधनपर कलगी तुरा जंगी सामना पार पडणार आहे.सदर सामना कोकणातील शैक्षणिक प्रवाहातील युवा शाहीर, कलगीवाले शाहीर प्रभाकर धोपट (वाटद – रत्नागिरी) विरुद्ध तुरेवाले शाहीर ज्ञानदीप भोईनकर (भरडखोल-श्रीवर्धन) ह्या दोन युवा शाहिरांमध्ये ही लक्षवेधी जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळणार आहे.
त्याचबरोबर उपरोक्त संस्थेच्या वतीने सामाजिक पटलावर अधोरेखित व्हावा असा स्तुत्य उपक्रम हाती घेत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना 'समाजरत्न पुरस्कार” ने गौरविण्यात येणार आहे. ह्या पुरस्काराचे मानकरी-प्रमोद गांधी (उद्योजक/संपर्क अध्यक्ष: मनसे गुहागर), रवींद्र मटकर (अध्यक्ष: नमन लोककला संस्था), रंगनाथ गंगाराम गोरीवले-चिकन्या भाई (अध्यक्ष: भैरी भवानी देवस्थान कमिटी), धोंडिबा दळवी (संचालक-श्री गुळबाई देवी विकास सेवा सोसायटी, कळसगादे), दिनेशजी कुरतडकर (संस्थापक: कोकण कलामंच, मुंबई), अरविंद मोरे “माऊली” (अध्यक्ष: श्री समर्थ कृपा भजन मंडळ (नालासोपारा – विरार) अशा कर्तृत्ववान व्यक्तींना अरविंद महापदी(निवृत्त पोलीस उपायुक्त मुंबई)यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे माहिती श्री पाणबुडी देवी कलामंच,मुंबई संस्थेचे अध्यक्ष संतोष घाणेकर आणि प्रवक्ते दीपक कारकर यांनी दिली.
Post a Comment
0 Comments