कोल्हापूर प्रतिनिधी : कागलच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेले नाव म्हणजे समरजित घाटगे. राजकीय प्रवासात आता घाटगे यांनी पुन्हा एकदा ‘घरवापसी’चा मार्ग स्वीकारत भाजपात पुनःप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
शाहू समूहाचे नेतृत्व करणारे घाटगे यांनी २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय कारकिर्दीची नवी दिशा घेतली होती. मात्र २०१९ मध्ये त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी पुन्हा राजकीय समीकरणे बदलली, पण अपेक्षित यश मिळाले नाही.
स्थानिक पातळीवर नगरपालिकांपासून ते जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत सक्रिय राहिलेल्या घाटगे यांच्या या निर्णयामुळे कागलच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी घेतलेला हा निर्णय भाजपासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर घाटगे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. आता त्यांच्या पुनःप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नेमके कोणते नवे समीकरण निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments