Type Here to Get Search Results !

चंदगड तालुक्यात भात लावणीला सुरुवात.


रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाचा वाढलेला जोर आता काहीसा कमी झाल्याने तालुक्यात भात लावणीला अर्थात रोपांना सुरुवात झाली आहे. शिवारे माणसांनी फुलून गेली आहेत. भात काढताना महिलांच्या गीतांनी शिवारं घुमू लागली आहेत. शिवारात यंत्रांची धडधड वाढली आहे. झालेल्या मोठ्या पावसाने सर्व शेत-शिवारामध्ये  पाणी झाले आहे. नदी-नाले,ओढे बऱ्यापैकी प्रवाहित झाले आहेत.साधारण जूनच्या एक दोन तारखेला पेरलेले भात आता लावण्यासाठी आले आहे. ट्रॅक्टर ,पावर टिलर द्वारे चिखल करून भात लावणीला शेतकरी प्राधान्य देतात. पूर्वी शेतकरी भात पेरत होते त्यावेळी तणांचा बंदोबस्त करणे खूप अडचणीचे जायचे. भांगलणीसाठी, कोळपणीसाठी मनुष्यबळ सुद्धा मिळेनासे झाले आहे. मात्र रोप केल्याने एक दोन भांगलणीचा खर्च कमी येतो. तंत्रज्ञानामुळे चिखल करण्यासाठी विविध अवजारे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आता भात लावणीसाठी पूर्णतः यंत्रांवर अवलंबून आहे. या हंगामात ट्रॅक्टर,पावर टेलर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

                   

यावर्षी शेतकऱ्यांनी भात (तरवे) पेरल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरलेल्या भातात पाणी साचले.अनेक ठिकाणी तरवे उगवलेच नाहीत. काही ठिकाणी कमी प्रमाणात उगवलेले आहेत. त्यामुळे रोप लावणीसाठी भाताची टंचाई निर्माण होत आहे.आत्ता पाऊस कमी झाल्याने रोप लावणीसाठी आणि भात उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल वाढली आहे. एकंदरीत चंदगड तालुक्यात सगळीकडेच रोपांना दमदार सुरुवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments