चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या जांबरे गावाने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली.जिल्हास्तरीय आर. आर. आबा. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.याचा चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतनी आदर्श घ्यावा असे आवाहन प्रा. ए.डी. कांबळे यांनी केले.ते चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालय व जांबरे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच विष्णू गावडे होते.
आपल्या भाषणात प्रा.कांबळे पुढे म्हणाले की, या गावातील महिलांनी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आदर्शवत आहे, एकजुटीमुळेच असे यश प्राप्त होते,कोणत्याही विकासकामांमध्ये मतभेद व मनभेद न बाळगता एकत्र आल्यास निश्चितच प्रगती साधता येते असे सांगून त्यांनी महिला विषयक सुरक्षेच्या कायद्याची माहिती सांगून मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात सरपंच विष्णू गावडे म्हणाले की, गावच्या एकजुटीमुळेच जिल्ह्यात माझी वसुंधरा चे प्रथम क्रमांक मिळवता आला.या कामी पुरुषाबरोबरच स्त्रियांचेही अतिशय मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
प्रास्ताविक डॉ. एन. एस.मासाळ यांनी करून वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने झांबरे गावातील विविध मुख्य रस्त्याच्या बाजूला वेगवेगळ्या जातीची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.डी गोरल, उद्योगपती लक्ष्मण गावडे, उपसरपंच रामकृष्ण गावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रकल्प अधिकारी प्रा.व्ही. के.गावडे यांनी मानले. या कार्यक्रमाला ग्रामसेविका अश्विनी कुंभार, उपसरपंच रामकृष्ण गावडे, पोलीस पाटील जानकू गावडे, तंटामुक्त अध्यक्ष लुमाजी गावडे,समृद्धी नाटेकर,भागीरथी गावडे, शिवाजी गावडे, सुभाष कांबळे, गणपत गावडे, गौरव गावडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व झांबरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments