Type Here to Get Search Results !

विज्ञानाला तत्त्वज्ञानाची जोड आवश्यक आहे-कॉम्रेड आनंद मेणसे

चंदगड/प्रतिनिधी : तत्वज्ञानाचा किंवा विज्ञानाचा विकास होण्यासाठी समाज दडपणापासून मुक्त व्हायला हवा,जो समाज दडपणाखाली आहे त्याच्यातून चांगली समाज निर्मिती होऊ शकत नाही यासाठी विज्ञानाला तत्त्वज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड आनंद मेणसे यांनी केले.ते चंदगड येथील र.भा माडखोलकर महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आलेल्या दत्ता बाळ स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयावर बोलत होते. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक ऍड.प्रा.एन एस पाटील होते.कॉम्रेड मेणसे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, उत्पादनाची साधने वाढली की वैचारिक मोकळीक  मिळते,जो समाज जिवंत आहे व ज्या समाजात वैचारिक संघर्ष होतो तेथेच नवनिर्मिती होते. तत्त्वज्ञान हे कधीही स्थिर नसते. धार्मिक दडपण हे सर्वात कठीण असतं ते जुगारून देणाऱ्याला अनेक त्रासातून जावे लागते असे सांगून त्यांनी तत्त्वज्ञान व विज्ञान याबाबत देशभरातील वैविध्यपूर्ण उदाहरणे सांगून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

 

प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, व वृक्षला जलार्पण प्रमुख पाहुणे कॉ. आनंद मेणसे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ एस.डी.गोरल यांनी करून शिवाजी विद्यापीठाने व्याख्यान आयोजित करण्यामागचा हेतू कथन करून सर्वांचे स्वागत केले.अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे संचालक ॲड.प्रा.एन. एस पाटील म्हणाले की, समाजातील मूलभूत प्रश्नांची उकल करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन, व तत्वद्यानाचे अचूक निरीक्षण असणे गरजेचे आहे याबाबत छत्रपती राजर्षी  शाहू महाराज यांच्या विचाराच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या गोष्टी चिकित्सक पद्धतीने तपासून पाहिल्या पाहिजेत. यासाठी वैविध्यपूर्ण वाचन व संशोधनाची चिकित्सक वृत्तीची  गरज असल्याचे सांगून त्यांनी दत्ता बाळ यांच्या आठवणी सांगून सखोल असे मार्गदर्शन केले.

 

यावेळी संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली  केली.सूत्रसंचालन प्रा. ए. डी.कांबळे यांनी तर व्ही.के. गावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, संचालक माजी प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील, एस.व्ही. गुरबे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments