चंदगड/प्रतिनिधी : 'शिक्षण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उद्याचा भारत घडवणारी पिढी घडत आहे. कोलिक सारख्या ग्रामीण, दुर्गम भागात घडणारे विद्यार्थी उज्वल राष्ट्र उभारणीत नक्कीच योगदान देतील. यासाठी प्रशासन स्तरावरून आवश्यक सोयी सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत'. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात कोलिक येथील जिल्हा परिषद शाळेत ते बोलत होते.
राज्यातील सर्व शाळा सोमवार दिनांक 16 जून पासून सुरू झाल्या. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचा शिक्षणाप्रती उत्साह वाढवा, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी अधिकारी वर्गांकडून शाळांना भेटी देऊन सहभाग नोंदवण्याच्या सूचना राज्य शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील मराठी विद्या मंदिर कोलिक शाळेची निवड केली.
नवागत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने मराठी विद्या मंदिर कोलिक शाळेत प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पंचायत समिती चंदगड येथून अधिकारी उपस्थित होते. वाद्यांच्या गजरात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, बूट याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक परसराम पवार यांनी शाळेबाबतचे सादरीकरण केले. यामध्ये शाळेची सद्यस्थिती, आवश्यक भौतिक सुविधा, अद्याप शाळास्तरावर सुरू असणाऱ्या कामांचा आढावा, लोकसहभाग व शासन स्तरावरून आवश्यक मदत याबाबत सादरीकरण झाले. तसेच शाळा सुधारणा चा आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला.
कार्तिकेय एन एस यांनी त्यांच्या भाषणादरम्यान मराठी विद्या मंदिर कोलीक शाळा आपण दत्तक म्हणून स्वीकारत असल्याची घोषणा यावेळी केली. शाळा प्रभावी असून आमच्या शासन सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व्यवस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक प्रभावी ज्ञानार्जन करता येईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शाळेसाठी पूर्णवेळ वीज मिळावी यासाठी सोलार व्यवस्था, संगणक वर्ग, शाळेची संरक्षण भिंत, वर्ग खोल्यांचे फ्लोरिंग तसेच इतर छत दुरुस्ती, शाळेसाठी स्वतंत्र स्वयंपाक गृह आणि धान्यसाठा खोलीची व्यवस्था, स्टेज कम हॉल, शाळा प्रांगणात पेविंग ब्लॉग्स तसेच पाण्याची व्यवस्था अशा इत्यंभूत व आधुनिक सुविधा आपण या शाळेसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबतचा रीतसर प्रस्ताव जिल्ह्याला पाठवण्याच्या सूचना कनिष्ठ अभियंता सर्व शिक्षा अभियान जयकुमार सदावरे यांना त्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांची हितगुज -
कार्तिकीयन एस याने विद्यार्थ्यांशी हितगुज केले. आई वडील आणि शिक्षक ही आपली दैवत असून त्यांना कधीही विसरू नका! असा कानमंत्र त्यांनी दिला. विद्यार्थ्यांना त्यांना काय व्हायचंय आणि शाळेत त्यांना आणखी काय हवंय याबाबत विचारणा करत संवाद साधला.
भारतीय बैठकीला पसंती - विद्यार्थ्यांसोबत बैठक
कार्यक्रम दरम्यान आपण विद्यार्थ्यांच्या सोबत जमिनीवर बसणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. खुर्च्या बाजूला करून सर्व अधिकाऱ्यांनी मुलासोबत बैठक घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ दिला व स्वतःही अल्पोपहार घेतला. या साधेपणाचे कौतुक सर्वांकडून होताना पहावयास मिळाले. कार्यरत शिक्षकांच्या कामाचे कौतुक ही त्यांनी यावेळी केले.
गावभेट-
प्रवेशोत्सव कार्यक्रमानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांनी कोळी गावाची पाहणी केली. यामध्ये सरकारी योजनेतून गृह बांधणी, सांडपाणी व्यवस्था, अंगणवाडी, शोष खड्डे, इत्यादी बांधकामाची पाहणी केली. आवश्यक सूचनाही अधिकारी वर्गाला त्यांनी यावेळी केल्या. पाहणी दरम्यान ग्रामसेवक शिवाजी कोल्हे यांनी कोळी गावातील व्यवस्था, पूर्ण झालेली बांधकामे, चालू बांधकामे याबाबत माहिती दिली.
प्रवेशोत्सव कार्यक्रमानंतर सर्व अधिकारी वर्गाने संपूर्ण शाळेची पाहणी केली. शाळेच्या वर्ग खोल्या, विद्यार्थी बैठक व्यवस्था, धान्यसाठा खोली, स्वयंपाक गृह, स्वच्छतागृह याची पाहणी केली. तसेच आवश्यक बाबींच्या नोंदी जबाबदार अधिकाऱ्यांना घेण्यास सांगितल्या. अंगणवाडी भेटीदरम्यान पोषण आहाराची चवही अधिकाऱ्यांनी चाखली. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांच्या समवेत शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण ही केले.
या शाळा भेटीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांचे सोबत गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, विस्ताराधिकारी सुरेश ठोंबरे व निवृत्ती कोंडुसकर, कनिष्ठ अभियंता सर्व शिक्षा अभियान जयकुमार सदावरे आदिलसह कोलिकचे उपसरपंच अनंत गावडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अनिल गावडे, ग्रामसेवक शिवाजी कोले,ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील तसेच शिक्षण विस्ताराधिकारी सुमन सुभेदार यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक परशराम पवार यांनी केले.
Post a Comment
0 Comments