(अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे स्वामी प्रतिष्ठानचा निर्णय)
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगडसह राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना आलेल्या पूरामुळे वाहतूक ठप्प झाली असून काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर स्वामी प्रतिष्ठानतर्फे चंदगडमध्ये बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी होणारा दहीहंडी उत्सव तात्पुरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.यासंदर्भात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती दिली. ते म्हणाले,“पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंब अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी उत्सव साजरा करण्यापेक्षा लोकांच्या मदतीला धावून जाणे आवश्यक आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव पुढे ढकलण्यात आला असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी.”
चंदगडमध्ये यावर्षी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जाणारा होता. मात्र, यंदा निसर्गाच्या संकटामुळे उत्सवाला ब्रेक लागला आहे. पुढील काही दिवसांत हवामानात सुधारणा झाल्यावरच पुढील कार्यक्रमाची तारीख निश्चित होणार आहे.
Post a Comment
0 Comments