चंदगड/प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रभावी पुढाकाराने दौलत साखर कारखाना चालक व कामगारांमधील वाद अखेर मिटला असून, आजपासून पुन्हा कारखान्याचे कामकाज सुरू होणार आहे.काल आमदार शिवाजी पाटील यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सकारात्मक हस्तक्षेप करून तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर आज आमदार पाटील यांच्या निवासस्थानी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना चालक, कामगार नेते आणि शेकडो कामगारांची बैठक पार पडली.
या बैठकीत आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की,
> “चंदगडचा शेतकरी जगला पाहिजे आणि कामगार टिकला पाहिजे,”
या विचारातून त्यांनी दोन्ही बाजूंना एकत्र आणत यशस्वी तोडगा काढला.
बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले :
कामगारांचा वेतनश्रेणी फरक टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय
दिवाळी बोनस तत्काळ देण्यात येणार
हलता महागाई भत्ता लागू करणे
कामगारांवरील सर्व केसेस मागे घेणे
बडतर्फी नोटिसा रद्द करणे
हंगामी कामगारांच्या प्रश्नावर ठराविक मुदतीत तोडगा
आणि या सर्व बाबींवर कायदेशीर करार करण्याचे ठरले
बैठकीत मानसिंग खोराटे यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, त्यांची अंमलबजावणीसाठी थोडा वेळ मागितला.कामगार संघटनांनी यास सहमती दर्शवली.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, चेअरमन मानसिंग खोराटे, तसेच कामगार नेते प्रदीप पवार, अशोक गावडे, शांताराम पाटील, महादेव फाटक, दिपक पाटील, बबनराव देसाई यांसह असंख्य कामगार, शेतकरी व पत्रकार उपस्थित होते.या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, चंदगड तालुक्यात पुन्हा उस गाळप हंगामाच्या तयारीला गती मिळाली आहे.



Post a Comment
0 Comments